राजापूर: राजापूर तालुक्यातील नाटे येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या घेरा यशवंतगड किल्ल्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याच्या घटनेची राजापूरचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. किल्ल्याच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार सामंत यांनी तातडीने पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच, शिवप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांशी थेट संपर्क साधून ते कामाच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. “किल्ल्याचे काम उत्तम प्रतीचेच झाले पाहिजे. यात कसलीही कसूर झाल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यासोबतच, आ. सामंत यांनी या ऐतिहासिक विषयावर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे. “ही आपली समृद्ध संस्कृती आणि इतिहास आहे, याचे जतन हे सर्वांनी मिळून करायचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सामंत यांनी या किल्ल्याचे काम दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीनेच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. यामुळे घेरा यशवंतगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.