चिपळुणात शेवटचे लोकेशन; मदतीसाठी कुटुंबियांचे आवाहन
गुहागर: गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपतीसाठी मंगळवारी निघाले असताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल, मंगळवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता चिपळूण परिसरात असताना त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता, त्यानंतर मात्र त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद येत असल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे.
गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी चव्हाण गुरुजींनी गुहागरहून प्रवास सुरू केला होता. काल सायंकाळी ५ च्या सुमारास ते चिपळूणला पोहोचले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला असून, अद्यापही त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे कुटुंबिय त्यांना शोधण्यासाठी हिंगोलीहून निघाले असून, त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे.
चव्हाण कुटुंब ज्या गाडीने प्रवास करत होते, ती गाडी किंवा त्यांना कोणी पाहिले असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे कळकळीचे आवाहन चव्हाण यांच्या कुटुंबियांनी केले आहे. या कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी भारत देवकांत पाटण (संपर्क: ९८५०२७७९४२) आणि अभिजित गोळे सर (संपर्क: ८९७५७३२०९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चव्हाण कुटुंब सुरक्षित असावे अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. या घटनेची माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा वरील दोन्ही व्यक्तींना संपर्क साधावा.
चिंताजनक! गुहागरहून हिंगोलीला निघालेले शिक्षक कुटुंब बेपत्ता, कुटुंबीय चिंतेत
