‘जांभळाचे अमाप पीक म्हणजे दुष्काळाचे संकेत’? वनस्पती शास्त्रज्ञांनी मांडले वैज्ञानिक सत्य!

saurabhsalvi26
374 Views

रत्नागिरी: सध्या सोशल मीडियावरील विविध व्हॉट्सॲप ग्रुप्सवर ‘यंदा बाजारात जांभळांचा मोठा सडा पडला असून हे आगामी भीषण दुष्काळाचे संकेत आहेत’ असा दावा करणारा एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये जुन्या पिढीचे काही दाखले देत जांभळाच्या भरघोस पिकाचा संबंध थेट दुष्काळाशी जोडण्यात आला आहे. मात्र, वनस्पती शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ज्ञांनी हा दावा पूर्णपणे खोडून काढला असून, जांभळाचे अमाप पीक येण्यामागे निव्वळ निसर्गाचे चक्र आणि अनुकूल हवामान कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रसिद्ध लेखक डॉ. धनंजय देशपांडे यांनी यासंदर्भात वनस्पती शास्त्राच्या (बॉटनी) प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा करून यामागील वैज्ञानिक सत्य समोर आणले आहे. कृषी विज्ञान आणि वनस्पती शास्त्रानुसार, जांभळाचे पीक भरघोस येण्याचा आणि भविष्यात पडणाऱ्या दुष्काळाचा कोणताही थेट संबंध नाही. गेल्या वर्षी झालेला पुरेसा पाऊस आणि त्यामुळे जमिनीत दीर्घकाळ टिकून राहिलेला ओलावा झाडांची अन्ननिर्मितीची क्षमता वाढवण्यास मदत करतो. तसेच, यंदा फेब्रुवारी ते मार्च या जांभळाला मोहर येण्याच्या काळात हवामान कोरडे राहिले, कडक ऊन पडले आणि अवकाळी पावसाचा फटका बसला नाही. यामुळे मोहर न गळता फळधारणा प्रचंड प्रमाणात झाली. याशिवाय, उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे मधमाश्या व इतर कीटकांद्वारे परागीकरण उत्तम रितीने पार पडल्याने जांभळाचे उत्पादन वाढले आहे. काही फळझाडांमध्ये एका वर्षी भरपूर फळे येणे आणि दुसऱ्या वर्षी कमी येणे हे निसर्गाचे नियमित चक्र असते, त्याला ‘अल्टरनेट बेअरिंग’ म्हटले जाते.

थोडक्यात सांगायचे तर, बाजारात दिसणारी जांभळाची रेलचेल ही दुष्काळाची चिन्हे नसून गेल्या काही महिन्यांतील अनुकूल हवामानाचा सकारात्मक परिणाम आहे. जुन्या समजुतींवर किंवा सोशल मीडियावरील अशा अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी यंदा जांभळाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. तसेच, आगामी मान्सूनच्या परिस्थितीसाठी केवळ भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अधिकृत अंदाजावरच विश्वास ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitors :
4576817
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *