अंबरग्रीसबाबत डॉ. विनय नातूंचा पुढाकार; केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे मच्छिमारांना आश्वासन

Gramin Varta
74 Views

गुहागर : व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस प्रकरणात खासदार नारायण राणे आणि खासदार विनोद तावडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे ठोस आश्वासन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मच्छिमारांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना दिले.

व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, वन, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांनी एक विशेष अभ्यास गट स्थापन केला आहे. या अभ्यासगटाला भारतातील राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मत्स्य संशोधक केंद्राचे मान्यवर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करत असून, डॉ. विनय नातू या अभ्यास गटाला मार्गदर्शक म्हणून सातत्याने मदत करत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय आणि राजकीय पाठपुरावा करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत.

मागील काही वर्षांत किनारपट्टी भागात व्हेल माशाची उलटी सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. या कथित तस्करीबद्दल अनेकदा मच्छिमार आणि किनारपट्टी भागातील सामान्य लोकांवर गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या विषयाबाबत प्रशासन, मच्छिमार आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर समज-गैरसमज पसरलेले आहेत. आजही व्हेल माशाची उलटी बाबत सत्यता तपासणारी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही किंवा उपलब्ध यंत्रणेला अनेक मर्यादा आहेत. यामुळे कायद्याचा दुरुपयोग आणि तस्करीच्या घटना घडत असतात.

प्राथमिक माहितीनुसार, अंबरग्रीस हा स्पर्म व्हेल माशापासून उत्पन्न होतो. स्पर्म व्हेल हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत येत असल्यामुळे त्याचा हा उत्सर्जित होणारा पदार्थ देखील कायद्यानुसार संरक्षित केला गेला आहे. मात्र, हा पदार्थ संरक्षित असावा की नसावा, याबाबत तज्ज्ञांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतमतांतरे आहेत. यासाठीच अभ्यास गटाने केलेला सखोल अभ्यास आणि संकलित केलेली माहिती प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. व्हेल माशाच्या उलटी संदर्भातील कायद्यात आणि धोरणात आवश्यक ते बदल करण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास अभ्यास गटाने व्यक्त केला आहे. हा अभ्यास करताना मच्छिमारांच्या पारंपरिक ज्ञानाचा देखील पुरेपूर वापर केला जाणार आहे.

- Advertisement -

सबंधित विषयातील कायद्यामधील बदल व इतर अनुषंगिक बाबींसाठी आपण स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे अ‍ॅड. डॉ. नातू यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनाही या सर्व आवश्यक बाबींची सविस्तर माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण विषयात महत्त्वाची भूमिका बजावत पुढाकार घेतल्याबद्दल मच्छिमार बांधवांनी डॉ. नातू यांचे विशेष आभार मानले. या प्रसंगी चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद तोरसकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Total Visitors :
4685147
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *