राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या पावस-मिठगवाणे (राज्यमार्ग १५५) वरील ओणी ते अणुस्कूरा घाट रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या मार्गाची गणेशोत्सवापूर्वी तातडीने डागडुजी करावी, अशी आग्रही मागणी पाचल तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रमुख दुवा असलेला आंबा घाट नैसर्गिक आपत्ती व धोक्यामुळे वाहतुकीस पूर्णतः बंद करण्यात आला आहे. परिणामी, या मार्गावरील सर्व प्रकारची अवजड व हलकी वाहतूक अणुस्कूरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. सातत्याने सुरू असलेल्या प्रचंड अवजड वाहतुकीमुळे ओणी ते अणुस्कूरा दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला असून जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारक आणि प्रवाशांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
कोकणातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात याच मार्गावरून होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी या संपूर्ण मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रस्त्याची वेळीच डागडुजी न झाल्यास जनतेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही पाचल तालुका निर्मिती कृती समितीचे कार्यालयीन सचिव तुषार पाचलकर यांनी दिला आहे. दरम्यान, या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तत्काळ दखल घेत पुढील योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.






