कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; आतापर्यंत १० हजार कोटींची मदत – एकनाथ शिंदे

Gramin Varta
95 Views

महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा

कर्जमाफीपासून लाडकी बहीण, रोजगारापासून गणेशभक्तांच्या सुविधांपर्यंत एकनाथ शिंदेंचा विकासाचा अजेंडा

मुंबई – शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत असून, “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा” या भूमिकेतून शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.ते मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असून, यापूर्वीही सुमारे सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार कोटी रुपयांची अशी एकूण दहा हजार कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यातही नियोजित वेळेनुसार पैसे जमा होत आहेत. या योजनेचा पुढील हप्ताही नियोजित वेळेत पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना आर्थिक आधार देण्याचे काम होत आहे. कितीही प्रयत्न झाले तरी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, अशी खात्रीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

तरुणाईच्या हाताला काम दिले पाहिजे. तरुणांना शिक्षण, रोजगार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे महायुती सरकारच्या काळात स्टार्टअपपासून स्किल डेव्हलपमेंटपर्यंत आणि रोजगारापासून उद्योग-उद्योजकतेपर्यंत विविध माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी सरकार काम करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील तरुणाईचा देश म्हणून भारताकडे पाहतात. त्यामुळे देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि राज्य सरकारनेही तरुणांसाठी रोजगार, कौशल्यविकास आणि उद्योगांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

नुसती खोटी आश्वासने देऊन जनतेने ज्यांना नाकारले आहे, त्यांनी तरुणाईच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी आणि तरुणांसाठी केलेले काम पाहावे, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

देशातील १४० कोटी जनता आणि तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहे. त्यामुळे देशात आणि जगभरात नरेंद्र मोदी यांची असलेली लोकप्रियता ही त्यांच्या विरोधकांच्या पोटदुखीचे कारण आहे. म्हणूनच तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. मात्र कितीही राजकारण केले तरी देशातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखते आणि त्यांच्या कामाची दखल घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रोटी, कपडा, मकान आणि रोजगार देणारे हे मोदीजींचे सरकार आहे आणि त्याचबरोबर महायुतीचे राज्य सरकारही लाखो लोकांना रोजगार आणि नोकऱ्या देण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करत आहे. उद्योग, स्टार्टअप, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रश्नांवरही सरकार सकारात्मकपणे चर्चा करत आहे. त्यांच्या भेटीसाठी महायुतीचे मंत्री गेले आहेत. त्यांच्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी आणि प्रश्न समजून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. या चर्चेतून मार्ग निघेल, असा विश्वास आहे. संबंधित प्रश्नांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची सरकारची भूमिका आहे.

कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त जातात. या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या प्रवासासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. गणेशभक्तांसाठी एसटीच्या माध्यमातून मोफत सोय-सुविधा देण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवला जात आहे. गणेशोत्सव हा गणेशभक्तांच्या आस्थेचा आणि भावनेचा सण असून, त्यांचे स्वागत करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि वातावरण निर्मिती करण्यावर सरकारचा भर आहे. गणेशभक्तांच्या स्वागतासाठी बॅनरही लावण्यात आले आहेत.

मिरवणुकीच्या संदर्भात हिंदुत्वाची भूमिका कमकुवत करण्याचा किंवा लाईन वेगळी करण्याचा प्रयत्न झाला, तरी आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या विचारांची आणि शिकवणीची आठवण ठेवून पुढे जाणार आहोत. गणेशोत्सव, गणेशभक्त आणि हिंदू संस्कृतीशी जोडलेल्या परंपरांचा सन्मान राखण्याची आमची भूमिका आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Total Visitors :
4754737
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *