रत्नागिरी : शहरातील रस्त्यांवर कर्कश आवाज करत धावणाऱ्या दुचाकींविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी तब्बल १० मोटारसायकलींवरील कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करत संबंधित वाहनचालकांकडून २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरातील वाढता ध्वनिप्रदूषणाचा त्रास तसेच मॉडिफाइड आणि कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. विशेषतः मोठ्या आवाजात वाहन चालवून नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.
कारवाईदरम्यान नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेले कर्कश सायलेन्सर काढून ते पोलिसांनी जप्त केले. तसेच संबंधित वाहनचालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील शांतता, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवू नयेत, तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कर्कश सायलेन्सरवर रत्नागिरी शहर पोलिसांचा दणका; १० दुचाकींचे सायलेन्सर जप्त, २९ हजारांचा दंड वसूल
Leave a Comment






