रत्नागिरीकरांची मोकाट गुरांच्या त्रासातून सुटका होणार; प्राणी मित्र संस्थेच्या शोधात पालिका प्रशासन

Gramin Varta
153 Views

रत्नागिरी : शहरातील मुख्य चौक, वर्दळीचे रस्ते आणि आठवडाबाजार परिसरात मोकाट गुरांनी घातलेल्या उच्छादामुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने कंबर कसली आहे. शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता पालिकेकडून एका अनुभवी प्राणी मित्र संस्थेचा शोध घेतला जात असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिली आहे. योग्य संस्थेची निवड होताच या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी शहरातील वाढत्या मोकाट गुरांमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. रस्त्यांच्या मध्यभागी बसलेली गुरे आणि बाजारातील गर्दीत होणारी त्यांची आपापसातील झुंज यामुळे दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटना रोजच घडत आहेत. इतकेच नव्हे, तर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर या जनावरांनी हल्ला केल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या सर्व परिस्थितीची गंभीर दखल घेत, प्रशासनाने आता प्राणी मित्र संस्थेची मदत घेण्याचे ठरवले आहे. संबंधित संस्थेच्या सहकार्याने शहरातील मोकाट गुरांना सुरक्षित स्थळी हलविले जाईल, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल. पालिकेच्या या निर्णयामुळे शहरवासीयांना होणाऱ्या नाहक त्रासातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *