रत्नागिरी : १७ सप्टेंबर रोजी कोळंबे गुरुकुल वसतिगृह येथे पाणंद रस्ते आणि शिवार रस्ते यांच्या नोंदीसंदर्भात विशेष मोहीम राबविणे साठी विशेष ग्रामसभा कोळंबे गावच्या ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मालन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, या ग्रामसभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या ग्रामसभेला उद्देशून बोलताना ग्राम महसूल अधिकारी मालन शिंदे यांनी कोळंबे आणि सोनगिरी गावातील ग्रामपंचायत दफ्तरी 23 नंबर ला नोंद असणाऱ्या रस्त्यांची नावे वाचन करून दाखवली, आणि त्याव्यतिरिक्त इतर शेतरस्ते तसेच पाणंद रस्ते यांच्या नसलेल्या नोंदी घालून घेण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. शासनाकडून अशा प्रत्येक रस्त्याचा सर्व्हे करून अशा रस्त्यांची नोंद करून प्रत्येक रस्त्याला एक नंबर दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले, त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनाबद्दल ( संजय गांधी निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, ऍग्रिस्टॅक, ई – पिक पाहणी ) माहिती सांगितली.
या ग्रामसभेसाठी प्रशासक प्रणय भायनाक सर ( विस्तार अधिकारी ) कोळंबे गावचे माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गावातील महिला वर्ग जेष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. शेतरस्ते आणि शिवार रस्ते यांची नोंद घालण्यासाठी आवश्यक ते सहकार्य गावातील ग्रामस्थांनी करावे अशी विनंती ग्राम महसूल अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांना केली.
ग्रामपंचायत 23 क्र.रजिस्टर व ग्रामस्थांनी सुचवलेले रस्ते यांची नोंद करण्यात यावी असा ठराव या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.





