GRAMIN SEARCH BANNER

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू : राजापूरातील जनमोर्चा बैठकीत निर्धार

Gramin Varta
195 Views

तुषार पाचलकर / राजापूर

ओबीसी आरक्षण हा आमचा हक्क असून त्याला धक्का लागू देणार नाही, असा ठाम निर्धार राजापूर तालुका ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी गरज भासल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या सभेला तालुक्यातील मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर, अ‍ॅड. शशिकांत सुतार, दिपक नागले, अनिल भोवड, प्रकाश मांडवकर यांच्यासह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीत बोलताना महेश शिवलकर यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींचा आढावा घेत सर्व ओबीसी बांधवांनी कृतीशील सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. गावागावांत ओबीसी संघटन उभी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मारुती खेडस्कर यांनी ग्रामीण भागातील लढ्याला शहरातील चाकरमान्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. अ‍ॅड. सुतार यांनी आरक्षणाशी संबंधित कायदेशीर बाबी स्पष्ट करत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. अभिजीत गुरव यांनी केवळ सभा न घेता प्रत्यक्ष आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची सूचना मांडली.

अनिल भोवड यांनी मुंबई येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश बाईत, मधुकर तोरस्कर, शुभांगी सोलगावकर, संतोष हातणकर, मनोहर गुरव आदींनी मार्गदर्शन केले.

बैठकीत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांचे मत शासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Total Visitor Counter

3379390
Share This Article