GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत २३ हजार ‘बोगस मतदान’ झाल्याचा खळबळजनक आरोप

Gramin Varta
338 Views

ठाकरे गटाचे उपनेते बाळासाहेब माने यांचा ‘गौप्यस्फोट’

रत्नागिरी: वर्षभरापूर्वी झालेल्या रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत तब्बल २३ हजार बोगस मतदार होते, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून हा अत्यंत मोठा ‘गौप्यस्फोट’ करण्यात आला असून, या बोगस मतदारांमुळेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचा अप्रत्यक्ष दावा माने यांनी केला आहे.

माने यांनी रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत, एक वर्षापूर्वीच्या निवडणुकीच्या वेळी वापरण्यात आलेली बोगस मतदार यादीच माध्यमांसमोर सादर केली. “मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट नावे, एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे आणि अस्तित्वात नसलेल्या लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली होती,” असा आरोप बाळासाहेब माने यांनी केला.
याबाबत बोलताना माने यांनी निवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्यात आली होती, असे स्पष्ट केले. “आम्ही पुराव्यानिशी ही बोगस नावे वगळण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्या वेळी कोणतीही गंभीर दखल घेतली नाही आणि ही बोगस नावे मतदार यादीतून वगळण्यात आली नाहीत,” असा थेट आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे. या बोगस मतदानामुळेच निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम झाला, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार बाळासाहेब माने यांनी यावेळी निवडणूक आयोगाकडे तातडीने दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, मतदार यादीतील ही सर्व बोगस नावे त्वरित वगळण्यात यावीत आणि यादी शुद्ध करावी. दुसरी मागणी म्हणजे, मतदार यादीतील त्रुटी दूर करून त्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका घेण्यात याव्यात.

बाळासाहेब माने (उपनेते, शिवसेना उबाठा) यांच्या या गंभीर आरोपांमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, यावर निवडणूक आयोग आणि प्रतिस्पर्धी पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3369375
Share This Article