GRAMIN SEARCH BANNER

भरधाव वाहनाच्या धडकेत रत्नागिरीत बैलाचा मृत्यू, वासरू जखमी; अपघातानंतर चालक पसार

Gramin Varta
321 Views

रत्नागिरी : शहरात ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी एका भीषण अपघाताने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे रोडवर, नाईक हॉलसमोर असलेल्या चंपक मैदानाच्या परिसरातील रस्त्यावर हा अपघात घडला. रात्री १९.४० वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन अत्यंत निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवत रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन गुरांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरे वासरू (पाडा) गंभीर जखमी झाले. या अपघाताचे सर्वाधिक संतापजनक कारण म्हणजे, हा अपघात घडवल्यानंतर अज्ञात चालकाने जखमी गुरांना कोणतीही वैद्यकीय मदत पुरवली नाही किंवा पोलिसांना माहिती दिली नाही.

माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करत, तो चालक थेट घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी, रत्नागिरी येथील शेट्येनगरमधील रहिवासी सागर सायब खेत्री (वय २८) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सागर खेत्री यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी पोलिसांनी दि. ०४/१०/२०२५ रोजी रात्री २३.४६ वाजता गु.आर.नं. ३९५/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या अज्ञात आरोपी वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ (बेफिकीरपणे वाहन चालवून सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणे), कलम ३२५ (जाणीवपूर्वक गंभीर दुखापत पोहोचवणे) यासह मोटार वाहन कायदा कलम १८४ (धोकादायकपणे वाहन चालवणे) आणि कलम १३४(ब)/१७७ (अपघाताची खबर न देणे व मदत न करणे) या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, रत्नागिरी पोलीस आता या अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत आहेत. निष्पाप मुक्या प्राण्यांचा जीव घेणाऱ्या व पळून जाणाऱ्या या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3368894
Share This Article