राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यातील रायपाटण-टक्केवाडी येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा लवकरात लवकर उलगडा करण्याचे स्पष्ट निर्देश तपास यंत्रणेला दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रायपाटण-टक्केवाडी येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. ही घटना गंभीर स्वरूपाची असल्याने आणि मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत गूढ असल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलाचे उच्चाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी स्वतः जातीने घटनास्थळाची पाहणी केली. त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी हे देखील उपस्थित होते.
या संवेदनशील ठिकाणी उप विभागीय पोलीस अधिकारी, लांजा उप विभाग, श्री. सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (स्थागुशा) पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली व उपलब्ध असलेल्या पुराव्यांची माहिती घेतली.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून, सत्य लवकर जनतेसमोर आणावे, असे मार्गदर्शन केले. त्यांनी लवकरात लवकर गुन्ह्याची उकल होण्याच्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या मार्गदर्शनामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या तपासाला अधिक गती मिळणार आहे.
पोलीस अधीक्षक बगाटे यांनी या संवेदनशील गुन्ह्याच्या तपासावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्यासाठी कसून तपास करत आहे. महिलेचा नेमका मृत्यू कशाने झाला, घातपात आहे की आणखी काही, या सर्व पैलूंचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने पाचल आणि राजापूर तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






