देवरुख/ विशेष प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या राजकारणात लवकरच नवे समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि आम आदमी पार्टीचे (आप) रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव यांच्यात सोमवारी देवरुख येथे सदिच्छा भेट झाली. गाव विकास समितीच्या फेसबुक अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.
या भेटीला ‘सदिच्छा भेट’ असे दोन्ही बाजूंकडून म्हटले असले तरी, आगामी देवरुख नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. गाव विकास समिती संघटना ही सामान्य माणसांचा विकास, ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न आणि पारदर्शक कारभारासाठी लढत असून आणि ‘आप’ सुद्धा विकास आणि पारदर्शक कारभारासाठी लढणारा पक्ष आहे.दोन्ही विकास आणि पारदर्शक कारभाराच्या भूमिकेवर काम करतात. त्यामुळे या दोन्ही संघटना आगामी निवडणुकीत एकत्र येऊन युती करणार का, याकडे आता संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या भेटीमुळे संगमेश्वर तालुक्याच्या राजकीय पटलावर नवी युती उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर देवरुख आणि संगमेश्वर तालुक्यात हे नवे राजकीय समीकरण उदयास आले, तर त्याचे काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गाव विकास समितीच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोत संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव, संगमेश्वर तालुका अध्यक्ष सचिन आपिष्टे आणि गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे दिसत आहेत. या फोटोखाली ‘ही सदिच्छा भेट म्हणजे, विकासाची गॅरेंटी आणि पारदर्शक कारभाराची हमी’ असे नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे राजकीय युतीच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
या भेटीवेळी गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, नितीन गोताड ‘आप’चे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव, तालुका अध्यक्ष सचिन आपिष्टे उपस्थित होते.






