ठाकरे शिवसेना विभाग प्रमुख वैभव मुरकर यांचा थेट इशारा प्रशासनाने वेळीच निर्णय मागे घ्यावा
संगमेश्वर/एजाज पटेल :संगमेश्वर तालुक्यात स्मार्ट वीज मीटरची जबरदस्तीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न होत असल्यास तो उबाठा शिवसेना कदापिही सहन करणार नाही, असा स्पष्ट आणि थेट इशारा उबाठा शिवसेना विभाग प्रमुख वैभव मुरकर यांनी दिला आहे. लोकांच्या संमतीशिवाय आणि विश्वासात न घेता लादली जाणारी ही योजना म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट असल्याचा आरोप त्यांनी केला.
“स्मार्ट मीटरच्या नावाखाली जादा वीज बिल, प्रीपेड प्रणालीचा धोका आणि ग्राहकांचे हक्क डावलण्याचा प्रकार सुरू आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर आणखी बोजा टाकण्याचा हा प्रकार आहे,” असे परखड मत वैभव मुरकर यांनी व्यक्त केले.
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत तीव्र नाराजी असून, अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही वीज वितरण कंपनी आणि प्रशासन जनभावनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“आम्हाला आंदोलन नको आहे, पण लोकहितासाठी वेळ पडल्यास शांत बसणार नाही. प्रशासनाने आणि वीज वितरण कंपनीने जनतेचा आवाज ऐकून ही सक्ती तात्काळ थांबवावी. अन्यथा जनतेत निर्माण होणाऱ्या असंतोषाला जबाबदार प्रशासन स्वतः असेल,” असा ठाम इशारा वैभव मुरकर यांनी दिला.
लोकशाही मार्गाने, चर्चेतून आणि पारदर्शक पद्धतीनेच कोणताही निर्णय घ्यावा, अन्यथा उबाठा शिवसेना संगमेश्वरच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संगमेश्वरमध्ये स्मार्ट वीज मीटरची सक्ती खपवून घेणार नाही






