संगमेश्वर–बावनदी महामार्गावरील खड्ड्यांबाबत नवनिर्मिती संघटनेची मागणी
संगमेश्वर | प्रतिनिधी : संगमेश्वर ते बावनदी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पॅचवर्क केल्याबद्दल नवनिर्मिती संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत. मात्र, हे पॅचवर्क तात्पुरते असून संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. त्या संदर्भातला पत्र संघटनेचे सचिव राजेश आंबेकर यांनी उपकार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री कुलकर्णी साहेब यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
नवनिर्मिती संघटनेचे सचिव राजेश आंबेकर यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात संगमेश्वर–बावनदी मार्गावर कायमस्वरूपी व दर्जेदार डांबरीकरण तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२५ जानेवारी २०२६ पूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण न केल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी “रस्ता रोको” आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई करून नागरिकांना सुरक्षित व सुकर रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा नवनिर्मिती संघटनेने व्यक्त केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा, कोळंबे आणि वांद्री बावनदी या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तातडीने डांबरीकरणाचे पॅचवर्क करण्यात यावे, अशी मागणी नवनिर्मिती संघटनेने केली आहे.
२५ जानेवारी २०२६ पर्यंत या ठिकाणी डांबरीकरणाचे पॅच न मारल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर–सोनवी पुलावर “रस्ता रोको” आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवनिर्मिती संघटनेने दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून संघटना या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, *पावसाळ्यात करण्यात आलेल्या निकृष्ट डांबरीकरणामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डे, उखडलेला डांबर आणि रस्त्यावर पसरलेले दगड यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा नवनिर्मिती संघटनेने दिला आहे.
२५ जानेवारीपर्यंत डांबरीकरण न झाल्यास २६ जानेवारीला रस्ता रोको; नवनिर्मिती संघटना आक्रमक






