रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला परिसरात जागेच्या वादातून कौटुंबिक वादाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात तरुणाने आपल्या काका-काकूंवर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले असून ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात संजय गोविंद कदम (५५) आणि त्यांची पत्नी मंगला संजय कदम (दोघेही रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) जखमी झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी अमोल विनायक कदम (२६, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री जागेच्या मालकीवरून संजय कदम आणि त्यांचा पुतण्या अमोल यांच्यात जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अमोलने संतापाच्या भरात संजय यांच्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी मंगला कदम या मध्ये पडताच त्यांनाही मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर जखमी दाम्पत्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.






