एजाज पटेल / संगमेश्वर : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळील जाखमाता मंदिर परिसरात पहाटे गंभीर अपघात घडला. महामार्गावर दिशादर्शक व पूर्वसूचना फलक नसल्याने कंटेनर चालकाचा अंदाज चुकला आणि कंटेनर थेट पुलावर चढला. यावेळी कंटेनरचा पुढील भाग तुटून खाली कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पहाटे सुमारे तीनच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारा कंटेनर जाखमाता परिसरातील मारुती मंदिराजवळून मार्गक्रमण करत असताना, चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे व अचानक बदललेल्या रस्त्याच्या रचनेमुळे चालकाचा अंदाज चुकला. चढाव आणि पुलाच्या अपूर्ण कामामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन पुढील भाग तुटून पडला, तर उर्वरित वाहन पुलाच्या कडेला अडकून राहिले.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सध्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी आवश्यक दिशादर्शक, इशारा फलक, रिफ्लेक्टर व बॅरिकेड्स नसल्याने अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप वाहनचालक आणि स्थानिकांनी केला आहे. अशा निष्काळजीपणामुळे वारंवार अपघात होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.






