कडवई: इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) या अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत आज ‘माझी मुंबई’ आणि ‘हैदराबाद’ या दोन बलाढ्य संघांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, या महत्त्वाच्या लढतीसाठी अंपायर (पंच) म्हणून कडवईचे सुपुत्र श्री. नवीद भोंबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानावर पंच म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री. भोंबल यांनी आपल्या अचूक निर्णयक्षमतेने आणि खेळाडूवृत्तीने या क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच अनुभवाची आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची दखल घेत ISPL प्रशासनाने त्यांच्यावर या मोठ्या सामन्याची जबाबदारी सोपवली आहे. एका ग्रामीण भागातील व्यक्तीने आपल्या कौशल्याच्या जोरावर थेट राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध लीगमध्ये पंच म्हणून स्थान मिळवणे, ही संपूर्ण कोकणसाठी आणि विशेषतः कडवई ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
नवीद भोंबल यांच्या या निवडीमुळे स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आजच्या सामन्यात त्यांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरेल आणि त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर तरुण पंचांना तसेच खेळाडूंनाही मोठ्या व्यासपीठावर जाण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.







