दिल्ली: भारताने १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश केला.टीम इंडियाच्या युवा संघाने आरोन जॉर्जच्या शतकामुळे अफगाणिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ४ बाद ३१० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडून आरोनने शतक झळकावले, तर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी अर्धशतके झळकावली, ज्यामुळे संघाला ४१.१ षटकांत ३ बाद ३११ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
भारताने १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही रचला आहे. यापूर्वी, हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. किवींनी २००६ मध्ये आयर्लंडविरुद्ध ३०५ धावांचे लक्ष्य गाठले होते. भारताने २० वर्षे जुना विक्रम मोडला आणि दिमाखात विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे, १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या १६ हंगामांपैकी १० वेळा भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताने ही स्पर्धा पाच वेळा विक्रमी जिंकली आहे आणि आता त्यांना सहावी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. शुक्रवारी अंतिम फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
अफगाणिस्तानने ठेनलेल्या लक्ष्याच पाठलाग करताना वैभव आणि आरोनने भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. वैभव त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. वैभव बाद झाल्यानंतर, आरोन आणि कर्णधार म्हात्रेने डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावा जोडल्या. म्हात्रे बाद झाल्यानंतर, आरोनने फलंदाजी सुरू ठेवली आणि शतक झळकावले. पण संघाला विजय साकारुन देण्यापूर्वीच तो बाद झाला. त्यानंतर विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
भारताकडून आरोन जॉर्जने १०४ चेंडूत १५ चौकार आणि दोन षटकारांसह ११५ धावा केल्या. वैभवने ३३ चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह ६८ धावा केल्या, तर म्हात्रेने ५९ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह ६२ धावा केल्या. विहान मल्होत्रा ४७ चेंडूत तीन चौकारांसह ३८ धावा करून नाबाद राहिला आणि वेदांत सहा चेंडूत पाच धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून नुरिस्तानी ओमरझाईने दोन विकेट्स घेतल्या. तर वहिदुल्लाह झद्रानने एक विकेट घेतली.
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६: भारत सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत






