रत्नागिरी : शहरातील ओसवालनगर परिसरात वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फहाद इक्बाल शाहा (रा. ओसवालनगर, रत्नागिरी) आणि एका अज्ञात इसमाचा समावेश आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता निरज देशमुख यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी ८ एप्रिल २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वीज मीटरच्या पीसीबीच्या मागील बाजूस फेरफार करून अतिरिक्त सर्किट जोडले होते. तसेच पीसीबीवर ‘सी-१०’ वायर सोल्डर करण्यात आली होती आणि मीटर टर्मिनलच्या वरच्या बाजूस छिद्र पाडण्यात आले होते.
या फेरफारामुळे मीटर मंदगतीने फिरून वीज वापराची कमी नोंद होत होती. या प्रकारामुळे महावितरणचे सुमारे ७१ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी संशयितांविरुद्ध विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कलम १३५ व १३८ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
रत्नागिरी : ओसवालनगर येथे मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा






