GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा

Gramin Varta
3 Views

मुंबई: महाराष्ट्रातही राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत आज पश्चिम क्षेत्र इंडिया स्किल स्पर्धेचे उद्घाटन झाले.

या कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा (२०२८) महाराष्ट्रात आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री चौधरी यांच्या पुढे मांडला. त्यावर चौधरी यांनी याबाबत होकार दिला आहे.

चीन मधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या अनुषंगाने केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात इंडिया स्किल राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्र विभागाच्या प्रमुख फेरी स्पर्धा होत असून यात मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील ३०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ११७ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यापुढील स्पर्धा नोएडा येथे होणार असून त्यानंतर अंतिम स्पर्धक चीन मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

गांधीनगर इंडिया स्किल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. कौशल्य स्पर्धेचे हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्याची दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘ पीएम सेतू ‘ योजना सुरू करून देशभरातील कौशल्य विकासाची गती वाढवली आहे. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला असून यामध्ये कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान असणार आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात विविध योजना यशस्वीरित्या राबविण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात कौशल्य विकासाचे कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले.

भारत हा तरुणांचा देश असून युवा शक्ती हीच विकसित भारताच्या संकल्पनेतील केंद्र बिंदू असून याच आधारावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासावर भर देत असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी यावेळी सांगितले.

चीन मधील शांघाय इथल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत यांत्रिकी (Mechatronics), वीज संच मांडणी (Electrical Installations) इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करणार आहेत. भारतीय विद्यार्थी यात कुठेही कमी पडणार नाहीत. महाराष्ट्रातील दोन स्पर्धकांनी गेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले असून या स्पर्धेतही नेत्रदीपक यश विद्यार्थी मिळवतील असा विश्वास व्यक्त करत मंत्री लोढा यांनी पुढील स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3096187
Share This Article