रत्नागिरी: शहरातील डम्पिंग ग्राउंडला मागील दोन दिवसांपासून लागलेल्या आगीमुळे कोकण नगर आणि आसपासचा परिसर धुराच्या विळख्यात सापडला आहे. रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलेले असतात, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. या दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडवरील कचरा सातत्याने जळत असल्याने निर्माण झालेला हा धूर वाऱ्याच्या दिशेने थेट कोकण नगर वसाहतीत शिरत आहे. रात्रीच्या वेळी या धुराचे प्रमाण इतके वाढते की, नागरिकांना आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या घट्ट बंद करून घ्याव्या लागत आहेत. तरीही धुराचा उग्र आणि घाणेरडा वास घराघरात पोहोचत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
‘घरात राहणेही झाले मुश्किल’
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वत्र धुक्यासारखा धूर पसरलेला असतो. यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली असून वाहनचालकांनाही कसरत करावी लागत आहे. “आम्ही घराचे दरवाजे उघडू शकत नाही, उघडले तर सगळा धूर घरात येतो आणि गुदमरायला होतंय,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. धुरासोबत येणारी कचरा जळल्याची दुर्गंधी इतकी तीव्र आहे की, त्यामुळे मळमळणे आणि डोकेदुखीचे त्रास वाढले आहेत.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
डम्पिंग ग्राउंडला ही आग लागली आहे की लावली गेली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. मात्र, दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित नगरपरिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन ही आग विझवावी आणि धुराच्या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी कोकण नगरवासीयांकडून केली जात आहे.
वेळेत पावले उचलली नाहीत तर या विषारी धुरामुळे परिसरात श्वसनाचे मोठे विकार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे.





