मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विनितिकीट प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून विनातिकीट प्रवाशांना पकडून २.४१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.कोकण रेल्वेने फेब्रुवारी २०२६ मध्ये नियमित तिकीट तपासणी उपक्रमांसह ८७३ तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या. ज्यामध्ये ४१,५२२ विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे आढळून आली. या प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंड म्हणून २.४१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी २०२६ पर्यंत एकूण १०,३६८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या.
या मोहिमांमुळे ४ लाख ५४ हजार ८४९ विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून एकूण २५.२१ कोटी रुपये वसूल करण्यात आले.कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. येत्या उत्सवाच्या हंगामात कोकण रेल्वे तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने त्यांच्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहिमा राबवेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
कोकण रेल्वे आपल्या संपूर्ण मार्गावर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाला प्रतिबंध करण्यासाठी, तसेच अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी करण्यासाठी, सातत्यपूर्ण व कसून तिकीट तपासणी मोहिमा राबवत आहे. कोकण रेल्वेने जानेवारी २०२६ मध्ये १,०१४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा आयोजित केल्या. यामध्ये ४४,७३६ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. या प्रवाशांकडून दंड स्वरूपात २.५३ कोटी रुपये वसूल करण्यात आले. तर, जानेवारी २०२६ पर्यंत अशा एकूण ९,४९५ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांमध्ये ४ लाख १३ हजार ६३७ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. दंड म्हणून २२.८१ कोटी रुपये वसूल करण्यात आले.





