समीर शिगवण / रत्नागिरी : निवळी–गणपतीपुळे मार्गावर जयगडकडे साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकला गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बारामतीहून जयगडकडे मालवाहतूक करत असताना माचीवलेवाडी येथे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डाव्या बाजूला कलंडला. मात्र यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक बाहेर उडी घेतल्याने तो बचावला. ट्रकची भीषणता पाहता चालक सुदैवाने बचावल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखोंचा तोटा झाल्याचे समजते. ट्रकमधील सुमारे १०० ते १५० साखरेची पोती झाडीत पडली. काही पोत्यांमधील साखरही सांडली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र माल चोरीला जाऊ नये यासाठी चालकाने रात्रभर घटनास्थळीच थांबून पहारा दिला. शुक्रवारी सकाळी अन्य वाहनाच्या सहाय्याने साखरेची पोती जयगड येथे हलविण्यात आली.दरम्यान, जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याबाहेर काढण्यात आला.







