खेड : चिंचवली ग्रामपंचायतीच्या नव्या कार्यकाळासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सरपंचांसह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्याने गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सन १९५८ च्या मुंबई ग्रामपंचायत पोटनिवडणूक नियमांनुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उच्च शिक्षित म्हणून ओळख असलेले गणेश सखाराम कांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वगुणांचा गावाच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदस्यपदी अनुष्का अविनाश पवार, किशोर विठु चव्हाण, वनीता सखाराम रासळ आणि सुरेश धोंडू जोगळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
गावातील सर्व स्तरांतून या निवडीचे स्वागत करण्यात आले असून, गावाच्या विकासासाठी एकमताने नेतृत्व मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. नव्याने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांकडून पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख प्रशासनाची अपेक्षा व्यक्त होत आहे. गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चिंचवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या ग्रामपंचायतीकडून लोकाभिमुख आणि सकारात्मक कामगिरी होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.






