संगमेश्वर: तालुक्यात झालेल्या प्रचंड वादळवाऱ्यामुळे विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. संगमेश्वर उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही निवळी आणि ३३ केव्ही आरवली या दोन्ही मुख्य वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने हा अंधार पसरला आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे ठिकठिकाणी विद्युत खांब मोडून पडले असून वीजवाहिन्यांचे संचही तुटले आहेत, ज्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम राबवून आरवली वाहिनीचा तांत्रिक बिघाड शोधला असून, त्या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
आरवली मुख्य वाहिनी लवकरात लवकर कार्यान्वित करून तालुक्यातील जास्तीत जास्त भागाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. निसर्गाच्या कोपामुळे ओढवलेल्या या संकटामुळे नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण संगमेश्वर विभागामार्फत करण्यात आले आहे






