मुंबई: महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भव्य अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने देशातील आघाडीच्या कंपन्यांसोबत ऐतिहासिक सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हे करार संपन्न झाले. राज्याच्या ऊर्जा विभागासोबत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी), अदानी पॉवर कंपनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या दिग्गजांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून, यामुळे राज्याला स्वच्छ आणि मुबलक ऊर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीवर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक होणार असून रोजगार निर्मितीला मोठा वेग मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे अदानी पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेडच्या वतीने तब्बल ६००० मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १,५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात सुमारे १२,००० रोजगार संधी निर्माण होतील. तसेच, रत्नागिरीतीलच पूर्णगड येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने अत्याधुनिक ‘भारत स्मॉल रिॲक्टर्स’ आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची क्षमता २ गुणिले २२० मेगावॅट ते ६ गुणिले १२१२ मेगावॅट इतकी प्रस्तावित असून, यासाठी ८,००० ते २,००,००० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाईल. या प्रकल्पातून तब्बल १,०३,००० लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ अर्थात एनटीपीसी लिमिटेडच्या वतीने भव्य अणुऊर्जा प्रकल्प आकारास येणार आहे. एकूण ६ युनिट्सच्या माध्यमातून ४,००० ते ७,२०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असून, यासाठी १,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर ५,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मोठी ताकद मिळणार आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या या स्वाक्षरी सोहळ्याला राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवरचे बिझनेस हेड विवेक शर्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिझनेसचे अध्यक्ष रंजय शरण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात राज्यात होणारी ही गुंतवणूक देशाला समृद्ध ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच मोठे बळ देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पुढे आलेल्या सर्व कंपन्यांना प्रशासनाच्या वतीने संपूर्ण आणि गतीने सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.






