GRAMIN SEARCH BANNER

छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं सुरु केली ‘कॉकरोच जनता पार्टी’

Gramin Varta
9 Views

छत्रपती संभाजीनगर : देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं ‘कॉकरोच जनता पार्टी’च सुरु केली. बनावट पदव्यांशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआय चळवळीसारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करत असल्याचे म्हटले.

देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं ‘कॉकरोच जनता पार्टी’च सुरु केली! गेल्या 72 तासांपासून सोशल मीडियावर (एक्सबॉक्स आणि इन्स्टाग्रामवर) एक भलतंच ट्रेंड करत आहे, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP). अवघ्या तीन दिवसांत, या ‘विनोदी’ आणि उपहासात्मक राजकीय आघाडीने देशभरातील 1,00,000 हून अधिक तरुणांना आकर्षित केले आहे आणि इन्स्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. या व्हायरल वादळाच्या केंद्रस्थानी आहे छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय अभिजीत दीपक दीपके.

छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके हा व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतिकार आहे. अभिजीतने पुण्यातून पत्रकारितेत पदवी घेतली. त्यानंतर, ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. नुकतेच प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून जनसंपर्क (पीआर) विषयात मास्टर ऑफ सायन्स (एमएस) पूर्ण केले आहे.

अभिजीत दीपकेला राजकीय संदेश व्हायरल करण्याचा व्यापक अनुभव आहे. 2020 ते 2022 दरम्यान आम आदमी पार्टीच्या (आप) सोशल मीडिया टीममध्ये एक प्रमुख स्वयंसेवक होता. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘आप’च्या बाजूने आलेल्या मीम्सच्या महापुरामागे अभिजीतचा हात मानला जातो. त्याने दिल्ली शिक्षण विभागासाठी संवाद सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

‘झुरळ जनता पार्टी’चा उगम कसा झाला?

सर्वोच्च न्यायालयाच्या एका तोंडी टिप्पणीनंतर ही चळवळ सुरू झाली. 15 मे 2026 रोजी, बनावट पदव्यांशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असे म्हटले होते की, काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआय चळवळीसारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करतात. नंतर सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून नव्हती, तर बनावट पदव्या असलेल्यांना उद्देशून होती. पण तोपर्यंत सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला होता.

नीट पेपरफुटी आणि बेरोजगारीमुळे संतप्त झालेल्या तरुणांचा राग अभिजीत दीपकेच्या लक्षात आला. त्याने X वर गंमतीने लिहिले की, जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल? आणि कॉकरोच जनता पार्टी नावाची एक वेबसाइट आणि गुगल फॉर्म सुरू केला. ‘द वीक’नुसार, अभिजीतने पक्षात सामील होण्यासाठी ठेवलेले निकष आजच्या जनरेशन-जीच्या तरुणाईला पटणारे होते. पात्रतेच्या निकषांमध्ये बेरोजगार असणे, आळशी असणे, सतत ऑनलाइन (दिवसाचे 24 तास इंटरनेटवर) असणे आणि व्यावसायिकपणे तक्रार करण्याची क्षमता असणे यांचा समावेश होता.

टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या प्रमुख नेत्यांनी सोशल मीडियावर या उपहासाला पाठिंबा दिला. एका पत्रकारिता पोर्टलनुसार, जरी याची सुरुवात एक विनोद म्हणून झाली असली तरी, आता हे पेपरफुटी, बेरोजगारी आणि तरुणांच्या मानसिक तणावावर एक मोठी राजकीय चर्चा बनली आहे.

Total Visitor Counter

3483539
Share This Article