GRAMIN SEARCH BANNER

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हातलोट घाट रस्ता सहा वर्षे रखडला; योगेश कदमांच्या बैठकीनंतर कामाला गती

Gramin Varta
7 Views

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा हातलोट घाट रस्ता गेल्या सहा वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडून पडला होता. मात्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत कठोर सूचना दिल्यानंतर आता या रस्त्याच्या कामाला गती मिळू लागली आहे.

या बैठकीनंतर सध्या हातलोट घाट परिसरात रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून पर्यावरणाच्या दृष्टीने केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रक्रिया राबवली जात आहे. लवकरच केंद्र शासनाची समिती संबंधित ठिकाणी पाहणी करणार असून समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करून रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आश्वासन दिल्याची माहिती नामदार योगेश कदम यांनी दिली.

हातलोट घाट रस्ता हा खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि पंचक्रोशीला थेट महाबळेश्वरशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. या रस्त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर खोपी-शिरगाव मार्गे सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही योगेश कदम यांनी सांगितले. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यास लोटे एमआयडीसी आणि सातारा जिल्ह्यामधील संपर्क अधिक सुलभ होईल. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला मोठी चालना मिळणार असून विस्तारित एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी मदत होणार आहे.
हातलोट घाट रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील अंतर अवघ्या २५ ते ३० किलोमीटरपर्यंत कमी होणार असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3410108
Share This Article