२ लाखांच्या रोकडसह दागिने आणि संसारोपयोगी सामान जळून खाक
रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीक असलेल्या आंबेशेत येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एका घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की, काही क्षणांतच घरातील संपूर्ण संसारोपयोगी सामान जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील मौल्यवान दागिने आणि कामगारांना देण्यासाठी घरात ठेवलेली सुमारे दोन लाख रुपयांची रोकडही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. या अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास संबंधित कुटुंबातील सर्व मंडळी आपआपल्या कामासाठी बाहेर गेली होती. घर बंद असतानाच अचानक घरातून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप असल्यामुळे आत प्रवेश करणे आणि आग आटोक्यात आणणे सुरुवातीला अत्यंत अडचणीचे ठरत होते.
अशा बिकट परिस्थितीत नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच घरातील गॅस सिलेंडर सुरक्षितपणे वेळीच बाहेर काढण्यात यश आले. गॅस सिलेंडर बाहेर काढल्यामुळे अत्यंत मोठा अनर्थ टळला असला, तरी आगीच्या या रौद्ररुपात संपूर्ण घराचे आणि आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.







