Ai चा वापर करून सेवा देणारी जिल्ह्यातील पहिली बँक
राजापूर: ग्राहकांसाठी अत्याधुनिक कार्यप्रणालीचा वापर करणाऱ्या येथील राजापूर अर्बन को.ऑप. बँकेने आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत एआय (Artificial Intelligence) सिस्टिम ही तांत्रिक नवीन सेवा सुरू केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यांनी दिली.
१३ जून पासून बँकेने ही सेवा कार्यान्वित केली आहे. या नवीन तंत्रज्ञानाद्वारे बँकेच्या कर्जदारांना त्यांचे दर महिन्याचे हप्ते भरण्यासाठी रिमाइंडर कॉल आणि संदेश जाणार आहेत. यासाठी या बँकेने एव्हीएस इन्सोटेक या कंपनीसोबत करार केला आहे. त्याद्वारे बँकेच्या कर्जदारांना पाठविण्यात येणाऱ्या संदेशाला ग्राहकांनी प्रतिसाद द्यावा असेही आवाहन केले आहे. त्यामुळे ग्राहकांचा कर्ज हप्ता, थकीत हप्ता, ते कर्ज हप्ता कधी भरणार आहेत? याचीही नोंद डिजिटल पध्दतीने त्या तंत्रात होईल. तसेच ग्राहकांनी कर्ज हप्त्यासाठी दिलेल्या तारखेला त्यांना पुन्हा रिमाइंडर कॉल-मेसेज करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जदारांनाही त्यांच्या कर्जाबाबत तसेच भरलेल्या वा थकीत असलेल्या त्या-त्या महिन्याच्या हप्त्याची माहिती मिळणार आहे. ग्राहकांना कर्ज खाते सुरळीत ठेवण्यास हे तंत्र उपयुक्त ठरेल, असे ओगले यांनी सांगितले. ही सेवा देणारी सहकारी बँकांमध्ये राजापूर अर्बन ही पहिली बँक ठरली आहे.