GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: आरे समुद्रात 41 विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला स्थानिकांनी वाचवले

Gramin Varta
378 Views

रत्नागिरी : आरे समुद्र किनारी कोल्हापूर येथील खासगी शिकवणी क्लासेस मधून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. मंगळवार दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाला येथील पोलिस कर्मचारी आणि झीप लाईनच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत वाचवले.

अतुल रघुनाथ सुतार (१७, रा. कोल्हापूर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर  मयूर विष्णू खाडे (16, रा. कोल्हापूर) याला स्थानिकांनी वाचवले. आरे समुद्रकिनारी कोल्हापूर येथून 41 विद्यार्थ्यांचा समूह आपल्या शिक्षकांसह दाखल झाला होता. हे 41 विद्यार्थी मंगळवारी दुपारी आंघोळीसाठी आरे समुद्रात उतरले. मात्र या 41 विद्यार्थ्यांपैकी अतुल सुतार हा विद्यार्थी पोहत पोहत समुद्रात पुढे पुढे जाऊ लागला. त्याला माघारी बोलवण्यासाठी त्याच्या मागोमाग त्याचा मित्र मयूर खाडे हा देखील गेला. मात्र पाण्याच्या करंटचा अंदाज न आल्याने अतुल सुतार हा पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला मयूर देखील पाण्यात बुडू लागला. दोघं विद्यार्थी बुडत असल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरड सुरू केली.

विद्यार्थ्यांची आरडाओरड ऐकून येथे असलेले ग्रामीण पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील यांच्यासह येथे असलेल्या झीप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी बुडणाऱ्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र या दुर्घटनेत अतुल सुतार याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. तर दुसरा विद्यार्थी मयूर खाडे याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आदेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बेशुद्ध अवस्थेतील मयूर खाडे विद्यार्थ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर्सनी सांगितले. या घटनेची माहिती मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना देण्यात आली असून त्याचे नातेवाईक रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते.

Total Visitor Counter

3451730
Share This Article