ग्रामस्थ, शिक्षकांच्या मेहनतीला यश
राजापूर : जिथे अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्या घटल्याने चिंतेत आहेत, तिथे राजापूर तालुक्यातील गोखले कन्याशाळेने एक आदर्श निर्माण केला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात गतवर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या या शाळेने, यंदाच्या शैक्षणिक वर्षात आपली पटसंख्या ५५ वरून तब्बल १०८ पर्यंत नेऊन दाखवली आहे. विशेष म्हणजे, पटनोंदणी सर्वेक्षणात शून्य दाखल होणारा पट असतानाही, शाळेच्या पहिल्याच दिवशी २२ मुलांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेऊन शाळेवर विश्वास दाखवला.
या यशामागे आमदार किरण सामंत यांचे सातत्यपूर्ण सहकार्य असून, त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच, समाजसेवक राजाभाऊ रसाळ यांनी शाळेतील भौतिक सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून आणि नगरपरिषदेमार्फत मिळालेल्या नगरोत्थान फंडातून बसवलेल्या ‘चाईल्ड फ्रेंडली एलिमेंटस्’मुळे मुलांचा शाळेकडे ओढा वाढला आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कुडाळी यांनीही शिक्षकांसोबत घरोघरी भेटी देऊन पटसंख्या वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या यशात मुख्याध्यापिका सौ. सायली भडाळे, पदवीधर शिक्षक सुहास काडगे, उपशिक्षिका सौ. सुचिता तवटे, श्रीमती मिताली आंगणे, अंगणवाडी सेविका सौ. शिवदे, तसेच अमृत तांबडे, सागर खडपे, नकाशे, वैभव नागरवाड, दांडेकर आणि परिसरातील अनेक शिक्षक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील, गुजराळी केंद्रप्रमुख अनिल जायदे आणि सर्व विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे ही शाळा सर्वांगीण प्रगती करत आहे.
स्वरांग भोसलेची ‘नासा इस्रो’ दौऱ्यासाठी निवड, आराध्य मांडवकरची नवोदयसाठी निवड (यावर्षी राजापूर शहरातून एकमेव), आणि शाळेद्वारे राबवले जाणारे विविध उपक्रम यामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही कामगिरी निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
राजापूरच्या गोखले कन्याशाळेची अभिनंदनीय भरारी: पटसंख्या 58 वरून 108 वर !

Leave a Comment