आंबेनळीसह राज्यातील प्रमुख घाटांत आता २४ तास पोलीस गस्त आणि रुग्णवाहिका सुविधा; मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेंची घोषणा

Gramin Varta
71 Views

मुंबई : आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर राज्य सरकार आता घाट रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत आक्रमक झाले असून, राज्यातील प्रमुख घाट रस्त्यांवर आता २४ तास पोलिसांची गस्त आणि १०८ रुग्णवाहिका तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून झालेल्या अपघाताची माहिती २४ तासांनंतर समोर आली होती, ज्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळू शकली नाही. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. या वेळी सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू आणि अस्लम शेख आदींनी घाट रस्त्यांवरील रस्ता रुंदीकरण, संरक्षक कठडे आणि आपत्कालीन यंत्रणेच्या अभावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले की, आंबेनळी घाटातील २४.२ किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘हायब्रीड अ‍ॅन्यूइटी’ (HAM) योजनेअंतर्गत वेगाने सुरू आहे. जरी राज्य मार्गावरील घाट रस्त्यांवर रुग्णवाहिका तैनात करण्याची अशी विशिष्ट तरतूद नसली, तरीही अपघात प्रवण क्षेत्रांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने नवीन धोरण आखले आहे. त्यानुसार, आता राज्याच्या प्रमुख घाट परिसरांमध्ये १०८ रुग्णवाहिका आणि पोलीस गस्त २४ तास उपलब्ध राहील, जेणेकरून अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून जीवितहानी टाळता येईल, असे त्यांनी नमूद केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *