वन विभागाने सुरक्षित सोडले जंगलातलांजा: डुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या एका बिबट्याला गुरुवारी (३ जुलै २०२५) सकाळी लांजा वनविभागाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले. लांजा तालुक्यातील गवाणे मावळतवाडी येथे ही घटना उघडकीस आली, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जेरबंद केलेला बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय अंदाजे अडीच वर्षे आहे. त्याला सुरक्षितपणे वनअधिवासात सोडून देण्यात आले आहे.
लांजा: डुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या एका बिबट्याला आज गुरुवारी (३ जुलै) सकाळी लांजा वनविभागाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले. लांजा तालुक्यातील गवाणे मावळतवाडी येथे ही घटना उघडकीस आली, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जेरबंद केलेला बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय अंदाजे अडीच वर्षे आहे. त्याला सुरक्षितपणे वनअधिवासात सोडून देण्यात आले आहे.
लांजा तालुक्यातील गवाणे, पुनस आणि लांजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वी पुनस येथे बिबट्याचे एक पिल्लूही सापडले होते, जे अजूनही वनविभागाच्या ताब्यात आहे.
गवाणे मावळतवाडी येथील लोकवस्तीपासून अगदी जवळच एका कंपाऊंडजवळ अज्ञात व्यक्तीने डुक्कराच्या शिकारीसाठी तारेची फासकी (लोखंडी सापळा) लावली होती. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीकडे फिरत असताना हा बिबट्या या फासकीत अडकला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी सकाळी लोकवस्तीजवळच्या कंपाऊंडच्या दिशेने एका अज्ञात प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने मावळतवाडी येथील काही नागरिकांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले. तेव्हा त्यांना बिबट्या फासकीत अडकल्याचे दिसले. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती लांजा वनविभागाला दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून बिबट्याला वाचवण्यासाठी नागरिकांच्या मदतीने पिंजरा लावण्याचे काम सुरू केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर, बिबट्याला पिंजऱ्यात यशस्वीरित्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
दरम्यान, लांजा तालुक्यातील वनगुळे येथे एकाच वेळी चार बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटनाही समोर आली आहे. अन्नाच्या शोधार्थ बिबट्यांचा लोकवस्तीकडे वाढलेला वावर आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.