रत्नागिरी: कोकण पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या ६ ते ७ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिवा-सावंतवाडी आणि सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिराने सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. मंगळवारी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने सावंतवाडी येथे पोहोचली, तर एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस सुमारे तीन तास आणि मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सव्वा तास उशिराने धावत होती. सातत्याने होत असलेल्या या विलंबामुळे जनशताब्दी, तुतारी, मांडवी आणि कोकणकन्या यांसारख्या प्रमुख गाड्यांचे पुनर्नियोजन करूनही त्या वेळेत धावण्यास अपयशी ठरत आहेत.
