रत्नागिरी : कोकणातील रेल्वे प्रवाशांना रोज भेडसावणाऱ्या अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक आज रत्नागिरी येथे पार पडली. राज्याचे परिवहन मंत्री ना. श्री. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीचे आयोजन आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या बैठकीत कोकण रेल्वे मार्गावरील विविध समस्या मांडण्यात आल्या. आमदार जाधव यांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करणे, पनवेल-चिपळूण दरम्यान नवीन गाडी सुरू करणे, तसेच रत्नागिरी व चिपळूण येथे आरक्षण कोटा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण मागण्या केल्या.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, “या प्रस्तावांना रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासन दिले.
या बैठकीमुळे कोकणातील हजारो प्रवाशांच्या अडचणींना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या सक्रिय पुढाकारामुळे ही बैठक फलदायी ठरली असून, प्रवाशांच्या हितासाठी ते सातत्याने कार्यरत राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर आमदार भास्कर जाधवांच्या पुढाकाराने सकारात्मक वाटचाल
