रत्नागिरी : निवळी ते जयगड मार्गावर १५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ओरी-घवाळीवाडी एस.टी. स्टॉपजवळ, दत्ताराम रहाटे यांच्या बागेसमोर झालेल्या या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक चांद मोहम्मद वल्लाभाई (वय २७, रा. कोचरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) हा (एम.एच./०९/जीजे/४३४७) बेळगावहून जयगडकडे जात होता. १५ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा ट्रक निवळी ते जयगड मार्गावरील ओरी-घवाळीवाडी येथे पोहोचला. चढावावर उजवे वळण घेत असताना, चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, बेदरकारपणे ट्रक चालवला. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या मध्यभागी आला आणि समोरून येणाऱ्या (एम.एच.०८/डब्ल्य/४७०३) टेम्पोला जोरदार धडक दिली.
या अपघातात टेम्पोमधील मुज्जकिर अमजत जांभारकर (वय ४२, रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, टेम्पोमधील इतर दोन प्रवासी अमजद अलीमिया जांभारकर आणि फिरदोस न्यायत खले (दोघेही रा. पडवे, ता. गुहागर) यांना लहान-मोठ्या स्वरूपाच्या गंभीर दुखापती झाल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश परशुराम टेमकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आरोपी ट्रक चालक चांद मोहम्मद वल्लाभाई याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
जाकादेवी येथील अपघातात एकाचा मृत्यू, ट्रक चालकावर गुन्हा
