दिल्ली: निवडणूक आयोगाने अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला मान्यता देणं, पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं यावर सर्वोच्च न्यायालयात सलग चौथ्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. कालची सुनावणी पार पडल्यानंतर राऊत न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी म्हटले की, सलग चौथ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. पक्ष आणि चिन्हाबाबत भूमिका मांडली. युक्तिवाद जोरदार चालला आहे. न्यायमूर्तींनी काही प्रश्न विचारले, सिब्बल यांच्या मनात काही भूमिका होत्या त्या त्यांनी मांडल्या आहेत. निवडणूक आयोगाने सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही, विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. याच्यावर आज युक्तिवादाचा जोर होता. मुळात आमचा युक्तिवाद असा आहे की, ज्या तारखेला पक्षात फूट पडली, तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षात फूट नव्हती तर विधिमंडळ पक्षात होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे, पक्ष तेव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं, नंतर काय झालं त्यापेक्षा 21 जून 2022 ला जी घटना घडली. पक्ष आणि चिन्ह यावर निकाल असायला हवा.पक्षाची रचना ही लोकशाही पद्धतीनेच आहे.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्यानंतर 13 नेते आहेत, 32, 33 उपनेते आहेत. राज्यसंघटक आहेत. सचिव आहेत. पक्षाची ही रचना लोकशाही पद्धतीने उभी केल्यानंतर याबाबतची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला त्यांना ज्या पद्धतीने हवी होती त्या पद्धतीने कळवली होती, तसेच याबाबत निवडणूक आयोगाची पोहोचपावती देखील आमच्याकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला मान्यता देणं, पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, असेही राऊत म्हणाले.
मुळात आयोगाने फुटीर गटाला मान्यता देणं हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य – संजय राऊत
Leave a Comment







