मजगाव : रत्नागिरी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजगावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बरकतअली अब्बास मुकादम यांची सलग १५व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. सातत्याने पंधरा वर्षे ग्रामस्थांचा विश्वास संपादन करत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याचा हा विक्रम मानला जात असून, त्यांच्या निवडीने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत मजगावने गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सलोखा, शांतता आणि सामाजिक एकोपा जपण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या उपक्रमात बरकतअली मुकादम यांनी अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावातील किरकोळ वाद, कौटुंबिक कलह तसेच जमीनविषयक वाद सामोपचाराने आणि कायद्याच्या चौकटीत सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मध्यस्थीमुळे अनेक वाद गावपातळीवरच मिटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
बरकतअली मुकादम यांनी यापूर्वी मजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारीही सांभाळली असून, ग्रामविकासाच्या विविध कामांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. सामाजिक सलोखा आणि ग्रामविकासासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
निवडीनंतर बरकतअली मुकादम म्हणाले, “ही निवड माझी नसून मजगावच्या एकीची निवड आहे. गावकऱ्यांनी माझ्यावर १५ वेळा दाखवलेला विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे. यापुढेही गाव तंटामुक्त, शांततापूर्ण आणि विकासाभिमुख ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन.”
या वेळी प्रशासक फय्याज मुकादम, माजी उपसरपंच शरीफ इब्जी, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसैन टेमकर, मुझफ्फर मुकादम, ग्रामविकास अधिकारी अर्चना कळबटे, मजगाव उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका, पोस्टमास्तर सायली गोरे, अंगणवाडी सेविका नफीसा नाखवा, जिक्रिया मुजावर, समीना मुकादम, आशा ताई, बचत गट प्रमुख नुझहत नाकाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर उपस्थितांनी बरकतअली मुकादम यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मजगावच्या तंटामुक्तीची धुरा सलग १५व्यांदा बरकतअली मुकादमांकडे; बिनविरोध निवडीचा विक्रम
Leave a Comment





