GRAMIN SEARCH BANNER

सर्व यंत्रणांनी सतर्क रहा ! आवश्यकतेनुसार स्थलांतरणाबाबत नियोजन ठेवा – जिल्हाधिकारी

Gramin Varta
25 Views

रत्नागिरी:- ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. ज्या संभाव्य नागरी वस्तीत पाणी भरण्याची शक्यता आहे, तेथील स्थलांतरणाबाबत नियोजन ठेवावे. कोणतीही घटना घडल्यास तात्काळ माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेतला.  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी यांनी प्रथम उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला.  त्यानंतर ते म्हणाले, धोकादायक पूल, साकव याठिकाणी आधीच काळजी घ्यावी. मार्गावर पाणी येत असल्यास त्याबाबत कोणतीही अनुचित घटना होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. त्या ठिकाणी सुरक्षेची कार्यवाही करुन तसा संदेश प्रदर्शित करावा. दुकानांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असल्यास तेथे पूर्वकाळजी घेवून स्थलांतरण करा. खासगी नुकसानीची पाहणी करावी. नागरिकांनी येणाऱ्या प्रत्येक संदेशाची खात्री करावी. जिल्ह्यातील यंत्रणांनी, अधिकाऱ्यांनी कोणतीही घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती द्यावी.

निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण भागातील साकव सुस्थितीत आहेत का, किती धोकादायक आहेत, याबाबत तशी सूचना त्याठिकाणी लावावी. धबधबे, धरणे, कालवे, पाणवठे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक आदेश काढावेत. बंदोबस्त ठेवावा. दरड कोसळणे, झाड पडणे याठिकाणी स्वत:हून विभागांनी जलद प्रतिसाद द्यावा. आरोग्य विभागाने आवश्यकतेनुसार औषध साठा, रुग्णवाहिका विशेषत: सर्पदंशावरील औषधसाठा पुरेसा ठेवावा.

Total Visitor Counter

3366979
Share This Article