रायगड: मुसळधार पावसामुळे कर्जत त्यालुक्यातील कोशाणे गावातील दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोशाणे येथील आशाणे वाडीतील रामा गोमा खडके यांचे घर कोसळून पूर्णतः पडले असून मौजे भोईरवाडी येथील आणखी एका घराचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तहसिलदार कार्यालयाच्या वतीने दोन्ही घटनांचे पंचनामे करून नुकसान अहवाल शासनाला पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. उल्हास नदीची धोक्याची इशारा पातळी ४८.१० मीटर व धोका पातळी ४८.७७ मीटर इतकी असताना, सध्या नदीची पातळी ४५.३० मीटर असून ती अजूनही ३.४७ मीटरने धोका पातळीपासून दूर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्हाधिकारी यांनी कर्जत तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाळा मंगळवारी (दि.१९ ऑगस्ट) बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी माहिती कर्जत तहसिलदार धनंजय जाधव यांनी दिली आहे.
रायगड – अतिवृष्टीचा आशाणे वाडीला फटका; 2 घरांचं नुकसान
