रत्नागिरी : येथील गणपतीपुळे समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेदरम्यान केलेल्या शोध मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी पोलीस दलातर्फे विशेष सन्मान करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बीडकीन येथून आलेल्या १९ पर्यटकांपैकी आठ पर्यटक २० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता गणपतीपुळे समुद्रात उतरले होते. पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्यामुळे हे पर्यटक बुडाले होते. स्थानिक जीवरक्षक व ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन तिघांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र पाच तरुण बेपत्ता झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलीस दलाने युद्धपातळीवर मोटर बोटींच्या साहाय्याने समुद्रात शोध मोहीम सुरू केली.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दल, भारतीय तटरक्षक दल आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे ही व्यापक शोध मोहीम राबवली. उधाणाचा समुद्र, प्रचंड लाटा आणि प्रतिकूल हवामान यांसारख्या गंभीर अडचणींचा सामना करत भारतीय तटरक्षक दलाने आपल्या अत्याधुनिक मोटर बोटी, तसेच प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अखंडपणे शोधकार्य सुरू ठेवले.
तटरक्षक दलाने रत्नागिरी पोलीस दलासोबत उत्कृष्ट समन्वय साधून अथक प्रयत्न केले, ज्यामुळे सर्व बेपत्ता पर्यटकांचे मृतदेह शोधून काढण्यात यश आले. या धाडसी आणि समर्पित कार्याबद्दल पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी तटरक्षक दलाच्या कार्याचे विशेष कौतुक करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.





