रत्नागिरी : अखेर भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत व महिला मोर्चा अध्यक्षा सौ वर्षाताई ढेकणे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने सौ. अनुश्री आपटे यांच्या कुवारबाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक चार मधील गरीब झोपडपट्टी धारकांच्या बरेच वर्ष प्रलंबित घरांचा व जागेचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर प्रकरणी दोन्ही जिल्हाध्यक्षांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या प्रदेश कार्यालयातील बैठकीत सदर मुद्दा व्यवस्थित मांडला व त्यावर चर्चेअंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर झोपडपट्टी धारकांचा प्रश्न पुढील सहा दिवसात आहे त्याच जागी जागा व घरे देऊन मार्गी लावावा असे निर्देश दिले आहेत.
सदर सभेला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावणकुळे,व मत्स्य व बंदर विकास मंत्री श्री. नितेश राणे, रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायणराव राणे उपस्थित होते. सदर निवेदन मान जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांना भाजपा कार्यकर्ते व दोन्ही जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थिती देण्यात आले.
सदर विषय मार्गी लावण्यासाठी प्रदेशाध्यक्ष श्री. रविद्र चव्हाण यांचे मुख्य सचिव श्री अनिकेत पटवर्धन यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, जिल्हा उपाध्यक्षा अनुश्री आपटे, कोषाध्यक्ष मध्य मंडल दिपक आपटे, शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, निलेश आखाडे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुवारबाव झोपडपट्टी धारकांच्या बरेच वर्ष प्रलंबित घरांचा व जागेचा प्रश्न मार्गी लागणार
