गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यास कोर्टाचा नकार
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील दोन अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका रत्नागिरी न्यायालयाने फेटाळल्याचे वृत्त आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी मारुती मंदिर येथे झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मालमत्ता विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी छेडछाड, असभ्य वर्तन करून मारहाण केल्याचा आरोप एका भाजी विक्रेत्या महिलेने केला होता.
या आरोपानंतर तक्रारदार महिला शहर पोलिसांकडे गेली होती. परंतु, पोलिसांनी या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. त्यामुळे महिलेने थेट न्यायालयात दाद मागितली आणि नगर परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. रत्नागिरी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई व्हावी, या मागणीनुसार तत्कालीन मालमत्ता विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील व शरद मुळ्ये यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली होती. या अधिकाऱ्यांपैकी नंदकुमार पाटील यांची गडहिंग्लज नगर परिषदेत बदली झाली असून, शरद मुळ्ये आता निवृत्त झाले आहेत. या अधिकाऱ्यांच्या वतीने ॲड. निलांजन नाचणकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे काम पाहिले.






