रत्नागिरी: राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे येत्या शनिवारी, दि. २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे.ते भरविण्याचा सन्मान नवनिर्माण शिक्षण संस्थेला मिळाला आहे.
शनिवार २२ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ ते रात्री १० असे एकदिवसीय साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. खल्वायनच्या उष:काल मैफिलीने संमेलनाचा जागर सुरू होईल. ग्रंथदिंडीत आधुनिक मराठीचे आद्य कवी केशवसुत, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, स्वामी स्वरूपानंद, कुसुमताई अभ्यंकर, ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर, गज़लकार बदिउज्जमा खावर या साहित्यिकांचे ग्रंथचित्र रथ हे आकर्षण असेल. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मराठी भाषा मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे हस्ते होत आहे.
ट्रान्सजेंडरसाठी अभूतपूर्व कार्य करणाऱ्या रत्ननगरीच्या सुकन्या श्रीगौरी सावंत, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, जेनझीफेम युवा कवी अनंत राऊत, युवा संशोधक डॉ. प्रतीक मुणगेकर यांच्या सहभागासह विविध परिसंवाद आणि संगमेश्वरी साज हे या संमेलनाची विशेष आकर्षणे आहेत.
अल्पोपाहार, भोजन यांची मोफत सुविधा पुर्ण दिवस साहित्यिक कार्यक्रमाचा रसस्वाद घेण्यात अडथळा आणणार नाहीत. आपला पुर्ण दिवस राखून ठेवा आणि आपण येत असल्याचे आवर्जून कळवा, असे आवाहन संयोजन समितीतर्फे अभिजित हेगशेट्ये यांनी केले आहे.





