मुंबई : अपना बँकेचे अध्यक्ष आणि सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दादर येथील श्रीकृष्ण सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तसेच नाबार्डचे संचालक श्री. सतिशजी मराठे यांनी चाळके यांच्या कार्याचा विशेष गौरव करताना सांगितले की, “दत्ताराम चाळके हे कोणत्याही गट, पक्ष किंवा जातिव्यवस्थेत न अडकता सहकार क्षेत्रात अनेक संस्थांना एकत्र घेऊन काम करणारे खरे नेतृत्व आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी, शेतकरी आणि लघुउद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सहकाराच्या माध्यमातून निर्णायक काम केले आहे. गेली 20 वर्षे त्यांच्या कार्याची मी साक्षी आहे. त्यांच्या कार्याची शिस्त आणि दृष्टीकोन प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमाला अपना बाजारचे अध्यक्ष अनिलजी गंगर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, ठाणे जनता बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदिप चव्हाण, सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, बृहन्मुंबई को-ऑप. बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष गुलाबराव जगताप, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, उद्योगपती प्रितेश देसाई, को-ऑप. बँक्स एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस नरेंद्रकुमार सावंत, डॉ. रामकृष्ण कोळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी चाळके यांच्या कार्यावर आधारित १३ मिनिटांचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या “अमृतकुंभ व्यवसाय वृध्दी योजना” मधील विजेत्या शाखांचा सत्कारही करण्यात आला.
चाळके यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, “सहकारामुळे सामान्य माणसाच्या हातात आर्थिक सामर्थ्य निर्माण झाले आहे. पुढील काळात मोबिलायझेशन, ग्रामीण बँकींग आणि अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची ठरेल. युवकांनी पुढे येऊन सहकाराचा नवा इतिहास घडवावा.”
मुंबई : सहकार क्षेत्रातील दत्ताराम चाळके यांचा जीवनगौरव सत्कार







