राजापूर : तालुक्यातील कणेरी येथील सड्यावर मंगळवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे ग्रामस्थ मोहन पाडवे यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या बागेतील अंदाजे २५ ते ३० काजू झाडे आणि सुमारे २५ आंब्याची कलमे जळून खाक झाली.
अचानक लागलेल्या या वणव्यामुळे पाडवे यांच्या बागेतील मोहोर आलेली काजू आणि आंब्याची झाडे पूर्णपणे जळून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे याच परिसरात त्यांची आणखी एक बाग असून, ती मात्र सुदैवाने वणव्यापासून वाचली.
या घटनेबाबत मोहन पाडवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली असून, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, वणवा नेमका कशामुळे लागला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजापूर : कणेरी येथे वणव्यामुळे आंबा, काजू कलमे जळून खाक





