रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि रिक्त असलेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने ७२ नवीन रास्त धान्य दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य वितरणाचे जाळे अधिक विस्तारणार असून इच्छुकांना १८ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जांची छाननी आणि प्रस्तावित जागेची पाहणी पूर्ण झाल्यानंतर ३१ मार्चपर्यंत जिल्हा पुरवठा विभागाकडे अंतिम अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ८६२ रास्त धान्य दुकाने कार्यरत असून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत ७२ नवीन ठिकाणांची भर पडणार आहे.या नव्या मंजुरीमध्ये दापोली आणि गुहागर तालुक्यांत सर्वाधिक प्रत्येकी १३ गावांचा समावेश करण्यात आला आहे, तर लांजा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ एका गावात नवीन दुकान सुरू होणार आहे. जाहीरनाम्यानुसार, मंडणगड तालुक्यातील वलौले, आंबवणे बु, काटे, बोरखत, वेसवी आणि नारायणनगर या सहा गावांचा समावेश आहे. दापोलीमध्ये मौजे दापोली, इळणे, सारंग, गव्हे, हातिप, पिसई, कोंगळे, रूखी, सातांबा, आजर्ला, उर्फी अशा विविध भागांत दुकाने प्रस्तावित आहेत. खेड तालुक्यातील सार्पिली, नांदिवली दंडवाडी, कर्जी, सवणस खुर्द, निळीक, हुंबरी, घाणेखुंट, तळघर, शिर्शी, कोंडिवली आणि कुळवंडी या गावांचा यामध्ये समावेश आहे. गुहागर तालुक्यात मुसलोंडी, असगोली, झोंबडी, मुंढर, पाभरे, मासू, रानवी, देवघर, आवरे, असोर, कातळवाडी, बारभाई आणि पांगरी तर्फे हवले येथे नवीन रेशन दुकाने सुरू होणार आहेत.चिपळूण तालुक्यातील वाघिवरे १ व २, केतकी, कालुस्ते बु, पर्शुराम, धामणवणे, नायशी, दुर्गवाडी खुर्द, पिलवली तर्फे, सावर्डे आणि रिक्तोली या गावांतही मंजुरी देण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात वायंगणे, कुंभारखाणी बु, देवरूख आणि कोंड्ये, तर रत्नागिरी तालुक्यात जयगड, वरवडे भंडारवाडा, नाखरे आणि शहरात काही ठिकाणी नवीन दुकाने येतील. राजापूर तालुक्यात पांगरी खुर्द, पडवे, आंबोळगड, वाल्ये, वडदहसोळ, सागवे, देवाचे गोठणे, सौंदळ आणि मोगरे भराडे या गावांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन दुकानांमुळे रेशन कार्डधारकांना धान्यासाठी लांबवर जावे लागणार नसून स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ७२ गावांत नवीन रेशन दुकानांना मंजुरी





