मुंबई : राज्य परिवहन विभागाने ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (एआयएमव्ही) पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. अलीकडेच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत ३२८ एआयएमव्हीना निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे.त्यामुळे सध्या अंमलबजावणीसाठी एआयएमव्हीची संख्या कमी पडत असल्याने प्रस्ताव पाठवल्याचे अधिकारी म्हणाले.परिवहन विभागामध्ये एकूण १,१५८ एआयएमव्ही पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी सध्या ७८५ पदे भरलेली आहेत. त्यामुळे अजूनही ३० टक्के पदे रिक्त आहेत. फील्डवरील कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी म्हणाले.यासोबतच सहायक आरटीओ कॅडरमध्ये अद्याप काही पदे रिक्त आहेत. मंजूर १८३ पदांपैकी १४०हून अधिक पदे भरली गेली असून, सुमारे ४२ पदे अद्याप रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी २१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली असून, ५१ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनुष्यबळ वाढल्यानंतर आरटीओकडून रस्ते सुरक्षा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येतील. इंटरसेप्टर वाहने, रडार प्रणाली, वेगमर्यादा तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली जाणार आहेत. वेळेवर मंजुरी आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील आणि रस्ते सुरक्षेतही वाढ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.सहायक निरीक्षक पार पाडतात महत्त्वाची कामेसहायक निरीक्षकांच्या माध्यमातून वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट, वाहन तपासणी अशी अनेक महत्त्वाची कामे पार पडली जातात.ही कामे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांना यांत्रिक व तांत्रिक ज्ञान, मोटार वाहन कायद्याची माहिती, प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती यांची तपासणी करून निवड होणे आवश्यक असते.सहायक निरीक्षकांची संख्या वाढल्याने अंमलबजावणी, नियमांचे पालन यावर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येईल.
आरटीओमध्ये लवकरच होणार मोठी भरती; ४६१ सहायक निरीक्षक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव





